Wednesday, April 1, 2020

गीताताईच्या बैठकीचा रसास्वाद

गीताताईच्या कालच्या बैठकीच्या निमित्ताने...

एखाद्या शांत संध्याकाळी आपण एका देवराईत बसलोय, पाखरं त्यांच्या घरटी बसून किलबिलाट करतायत, कसलीतरी अनामिक ओढ मनात संमिश्र भावनांचे हेलकावे आणतेय, त्याचवेळी एका अदृश्य झर्‍याचा खळखळाट ते हेलकावे शांत करतोय, मधेच खवळलेल्या समुद्रातील वादळानं उफाळणार्‍या लाटा दिसतायत, त्यांना शमवणारी ऋषितुल्य ओंकारासारखी राऊळघंटा ऐकू येतेय, आणि काही अमृतस्वर मखमली मोरपीसांनी आपल्याला कुरवाळतायत, हे सारे अनुभव एकामागोमाग येणं म्हणजे कालचं गीताताईचं गाणं..!

रागंच असा बेफाट निवडलेला की बास...!! ललितागौरी....!! अस्तास जाणार्‍या सूर्याबरोबर मनात उत्पन्न होणारी हुरहूर दाखवणारा गौरीतला कोमल ऋषभ, आणि ती झटकणारा उगवतीच्या नवक्षितिजावरची झळाळी दाखवणारा ललतचा मध्यम, यांचा मिलाफ गीताताईनं असा काही दाखवला, की "वाह, क्या बात है, बहोत अच्छे..!!" अशी दाद नकळत जात होती. सुरुवातीच्या आलापीने एखाद्या अचल पर्वताची ऊंची आणि खंबीरता समोर उभी केली...आणि मग त्याच पर्वतातून उगम पावलेली नदी खळाळत यावी तशी "प्रीतम सैया" ही पारंपरिक बंदिश गीताताईनं अप्रतिम सादर केली. गंभीर सागरात हळूहळू उभवत गेलेली लाट पुढे पुढे सरकत किनार्‍याला येऊन भिडावी, तसा "प्रीतम सैया"तल्या "सै" वरच्या पहिल्या समेचा वेध  गीताताईनं असा काही घेतला की, सुरूवातीला म्हटल्याप्रमाणे ती देवराईतली राऊळघंटा थेट रसिकांच्या हृदयात वाजली. तो निनाद अजूनंही हृदयात रुंजी घालतोय. त्यानंतरची "तोरी सावरी सुरत मन भायी" ही मध्य लय त्रितालातली चीज म्हणजे सुभानल्ला...!! काठ पदराची पैठणी नेसून नानाविध अलंकार लेवून लडिवाळपणे त्या कान्ह्यावरचं प्रेम दाखवणारी राधा गीताताईच्या स्वरास्वरात दिसत होती. ताना, बोलताना, सरगम यांच्या महिरपी ओलांडत सातव्या मात्रेपासून वजनदारपणे उठाव घेणारी ही बंदिश गीताताईनं काय पेललीय...!! वा वा.

खवळलेला समुद्र शांत होऊन त्याची धीर-गंभीरता प्रत्ययास यावी तसा ललितागौरी नंतर गीताताईनं पेश केलेला चंद्रकौंस. सा गं म धं नि या फक्त पाच स्वरांमधून हा धीर-गंभीरतेचा माहोल उभा करणं म्हणजे काही खायची गोष्ट नव्हे. त्यासाठी "देता किती घेशील दो कराने" असा अथांग स्वरसागर उभा करणार्‍या विदुषी शुभदाताई पराडकरांसारख्या गुरु आणि त्या स्वरसागरात अनंत डुबक्या मारून स्वरमोती वेचणारी गीतताईसारखी शिष्या, असं मेतकूट जमावं लागतं. हे मेतकूट गीताताईच्या कालच्या चंद्रकौंसातील स्वरास्वरातून, श्रुतीश्रुतीतून, आणि मात्रेमात्रेतून चाखायला मिळत होतं. गुरु विदुषी शुभदाताईंनीच बांधलेल्या "ए करतार" (विलंबित रूपक) आणि "एरि मै जानू" (मध्य लय एकताल) या बंदिशी गीताताईनं मांडल्या. आहाहा....!! "ए करतार" मधला साडे सहाव्या मात्रेवरचा उठाव घेऊन रुपकची सातवी मात्रा भेदून सम गाठायचा काय तो डौल...!! तसंच "एरि मै जानू" मधली एकतालातली दहाव्या मात्रेवरुन उचल घेऊन छेडलेली सम काय वर्णावी...!! काय ती पेशकश, काय ती नजाकत, काय तो ठेहेराव...केवळ शब्दातीत…!!! अफाट ताकदीच्या, कसलेल्या आणि ज्ञानी गुरुकडून मिळालेल्या भक्कम पायावर एखादा शिष्य त्याच्या अपार आणि प्रामाणिकपणे घेतलेल्या मेहनतीने कसं उत्कृष्ट स्वरशिल्प उभारू शकतो याची मूर्तिमंत अनुभूती गीताताईनं कालच्या तिच्या चंद्रकौंसातनं दिली.

त्यानंतरचा खमाज मधला टप्पा म्हणजे ताना, बोलताना यांची सौंदर्यपूर्ण आतषबाजी करत पश्तो या तशा अनवट तालाशी खेळलेला लालित्यपूर्ण खेळ होता. वेगवान तानांमधला दाणेदारपणा अबाधित ठेवून, स्वराला जराही इकडे तिकडे हलू न देता, मात्रेमात्रेवरची हुकूमत कायम ठेवण्याचं अचाट कसब गीताताईनं लीलया दाखवलं. त्यात बारा वर्ष गुरु विदुषी शुभदाताईंकडून घेतलेले सौंस्कार क्षणोक्षणी प्रतिबिंबीत होत होते.

मग रसिकांकडून नाट्यसंगीताची फर्माईश आली. त्याला गीताताईनं "नाथ हा माझा"नं उत्तर दिलं. यमनचे कुरुवाळणारे अवीट स्वर, शुभदाताईंनी देऊ केलेलं ऋषितुल्य सौंस्कारांचं लेणं, आणि गीताताईचा गोड गळा या तीन भरजरी वस्त्रांची ती परिटघडी होती. यमन आणि "नाथ हा माझा" मधील बारीक बारीक जागांची स्वररत्न त्या परिटघडीतून गीताताईनं अलगदपणे उलगडवून दाखवली. आमच्या corporate क्षेत्रात "succession planning" नावाचं एक तत्व आहे. त्यानुसार बाल गंधर्व आणि माणिकताईंच्या नंतर "नाथ हा माझा" रसिकांना त्याच तोडीने ऐकवण्यासाठी देवी सरस्वतीनं गीताताईला या भूतलावर पाठवलंय असं मला नेहमी वाटतं. यात कुठलीही अतिशयोक्ति नाही. ज्यांनी गीताताईचं "नाथ हा माझा" ऐकलंय त्यांना मी म्हणतोय ते पटेल.

कुठल्याही चांगल्या गोष्टीला शेवट हा असतोच. त्याप्रमाणे शेवटी भैरवीचा आर्त आलाप गीताताईनं घेतला. "कैसी ये भलाई" ही चीज आणि त्यानंतर घेतलेल्या द्रुत लईतील तराण्याने एखाद्या घरंदाज बैठकीच्या गाण्याची सांगता ज्या दिमाखात व्हायला हवी तशीच झाली. आपण आयुष्यात अनेक बैठकीच्या मैफिली ऐकतो, जागतो. पण एकाच हाताच्या बोटावर मोजता येतील अशा अगदी थोडक्या बैठकी असतात, ज्या हृदयाच्या अगदी आतल्या कप्प्यात चिरंतन घर करून राहतात. कधीही मनात येईल तेव्हा तो कप्पा उघडावा, त्यातील स्वरपुष्प हळुवारपणे काढावीत, पुन्हा अनुभवावीत आणि त्या कप्प्यात परत अलगद ठेवून द्यावीत....अगदी तस्सच झालं कालचं गीताताईचं गाणं.......!!

-- सौरभ जोशी

No comments:

Post a Comment