Wednesday, April 1, 2020

महिपतगड-सुमारगड-रसाळगड पदभ्रमण - एक स्वप्नपूर्ती


 महिपतगड-सुमारगड-रसाळगड पदभ्रमण - एक स्वप्नपूर्ती
-- सौरभ जोशी

रसाळ-सुमार-महिपत ही दुर्गत्रयी प्रत्येक डोंगरभटक्याला नेहमीच खुणावणारी...या वाटेवर जाऊन या गिरिदुर्गांच्या अंगाखांद्यावर बागडणं कित्येक वर्षांपासून मनात होतं..तसंच महिपतगड आणि सुमारगड यांच्या कुशीत विसावलेल्या बेलदारवाडी या गोंडस गावाबद्दल आणि सुमारगडाच्या गर्द रानवाटेवर एकटाच राहणारा राया धनगर आणि त्याच्या झापाबद्दल मनात बरंच कुतुहल होतं..पण योग येत नव्हता...२-३ वेळा काही अपरिहार्य कारणांमुळे बेत ठरवून देखील रद्द करावा लागला...पण या दुर्गराजांनी शेवटी माझी बालमुखातली हाक ऐकली आणि बोलावा धाडला..आणि योग आला चक्रम हायकर्स या माहेरच्या माणसांबरोबर ही दुर्गभ्रमंती करण्याचा...मग काय म्हणता? ते दुग्धशर्करायोग, मणिकांचनयोग, सोने पे सुहागा, वगैरे सगळंच झालं...

निघालो मग २६मे च्या रात्री...खेडजवळील वाडी जैतापुर मार्गे बेलदारीच्या रस्त्यास लागलो...तेव्हा कळलं की, वाडी जैतापूर ते वाडी बेलदार हा आता गाडरस्ता होतोय..ते पाहून मनात संमिश्र भावनांचं रसायन तयार झालं...एकदा वाटलं, च्यायला आता या आसमंतातले रुख भुईसपाट होणार, गाड्या-घोडे येणार, गर्दी वाढणार, कचरा होणार..पण त्याचवेळी असंही वाटलं, की वाडी बेलदार हे कुठल्या कोपच्यातलं गाव..साधं रोज लागणारं जिन्नस आणायचं तर दोन आडीच तासाची पायपीट करून खाली वाडी जैतापुरास या, आणि परत तीन साडेतीन तासाची चढाई करून जा, असले भरमसाठ कष्ट...काही दुखलं खुपलं तर अडीच तास खाली उतरून पुढे वीसेक किमी खेड शिवाय चांगली वैद्यकीय सेवा नाही...मग या बेलदारकरांनी असंच राहावं का? तेव्हा उमगलं की या रस्त्यामुळे गावकर्यांचे कष्ट वाचतील, हे ही नसे थोडके...असो..

दोनेक तास
चालल्यावर माझं पहिलं कुतुहल माझ्यासमोर उभं राहिलं...

वाडी बेलदार...नावंच किती छान..एका बाजूस महिपताचा एक दांड, मागल्या बाजूस त्याच्याच अजस्र अंगाचा झाडोरीनं इंच इंच शाकारलेला एक भाग, अन् एका बाजूस पार सुमारगडापर्यंत जाऊन भिडणारं अफाट जंगल...आणि या सगळ्यात अख्ख्या हिरव्या गालिच्यावर मणी मांडून ठेवावेत अशी बेलदारकरांची घरटी...

सिताराम जाधवांच्या घराच्या पडवीत जरा विसावलो, पाणी जरा घोटलं, आणि महिपताच्या दांडावरून निघालो...रात्रीचा मुक्काम पारेश्वराच्या मंदिरात करायचा होता...सह्याद्रीतील पाहता क्षणीच मनाला भुरळ पाडणार्या काही थोडक्या जागांपैकी ही एक...आजूबाजूस जिथं आणि जिथपर्यंत नजर जाईल तिथं आणि तिथपर्यंत किर्र जंगल..आणि मधल्या मोकळ्या जागेवर
पारेश्वराचं मंदीर..पुढ्यात विहीर...अशा विलोभनीय ठिकाणी आज राहायचं या आनंदात आम्ही सारे...


..पण लवकरंच लक्षात आलं की महिपताच्या मनात वेगळंच होतं...वैशाख सरून गेलेला..तेव्हा गडावरल्या दोन्ही विहिरीतलं पाणी सूर्यानं आग ओकून संपवून टाकलेलं...राहणार कसं?...मन भलतं हिरमुसलं...गड फिरून परत खाली वाडी बेलदारीत उतरण्याशिवाय उपाव नव्हता...काय करणार? निसर्गदेवतेची ईच्छा...ती शिरसावंद्य...पाठपिशव्या उचलून बेलदारीच्या वाटेस लागलो...

वाटेत एका कड्यावर जानकर धनगरणीच्या झापाशी टेकलो...एवढाल्या आसमंतात ही आणि तिचं ४-५ वरुसाचं पोर
येकुटवाणे राहतात...सोबतीस कोण? तर २-३ गुरं, एक कुत्रं...आणि महिपतगडाचा पहारा...तिचं ते निर्भीड जीवन पाहून फार कवतिक वाटलं आणि स्त्रीस अ'बला' का म्हणतात हा प्रश्न पडला....तसंच Miss World, Miss Universe, Miss Woman इ. किताब या जानकर धनगरणीसारख्या हिरकण्यांना दिले तर त्या किताबांची शोभा अधिक वाढेल,असा विचार माझ्या मनाला चाटून गेला इतकंच...!!


धनगरणीस विचारलं "पाणी कुठलं तुम्हास?"...तसं म्हणाली "गडावरचं.."...मी म्टटलं "कुठलं गडावरचं?"...म्हणाली "इहिरीतलं.." मी विचारलं, "विहिरींना तर पाणी नाही, मग कनचं पानी?"...त्यावर या बाईसाहेब सहज म्हणाल्या, "बराबर हाय तुमचं...उद्यांच्याला जाईन आन् इहिरीत थोडं खनंल...आन् मंग थोडकं पानी गावंल...."...मी सुन्न झालो हे ऐकून...पाण्यासाठी माणसाला किती कष्ट करायला लागावेत? त्याला काही सीमा? पण हे वज्र लीलया पेलत ही धनगरीण सहज म्हणते की थोडं खणलं की पाणी गावेल...बाथरूम मध्ये जाऊन नळ सोडला की पाणी मिळणार्या आणि ते वाया घालवणार्या शहरी सुखवस्तूंना हे विदारक वास्तव दाखवायला हवं...असो.

तिला नुसतं "ताक आहे का?" विचारायचा आवकाश, तिनं दोन हंडे ताक आमच्यासमोर आणून ठेवलं...त्या ताकाची लज्जत सांगण्यासाठी वाणी, वैखरी आणि लेखणी, सार्याच असमर्थ आहेत. महिपताच्या पारेश्वर मंदीरात न राहता आल्यामुळे झालेल्या मानसिक हिरमोडीतून या ताकाच्या भुरक्यांनी आम्हाला बाहेर काढलं, आणि काही वेळातंच बेलदार वाडीत परत आलो.

मावळतीस सोनेरी रंग देऊन भानुराज वसुंधरेच्या दुसर्या गोलार्धावर उगवतीच्या छटा देण्यास निघून गेले, आणि इथे लख लख चंदेरी तेजाची सारी दुनिया काजव्यांच्या रुपात आमच्यासमोर रुखारुखातून चमचमायला लागली. विजेची लाट जावी तसा लक्ष लक्ष काजव्यांचा लखलखाट रानातून सरकत होता...ते एकमेवाद्वितीय दृश्य डोळ्यांत साठव साठव साठवलं आणि जाधवमामांच्या पडवीत परतलो.

रात्री पडवीतंच पथार्या टाकल्या आणि निद्रादेवीनं कधी गारूड केलं कळलंच नाही...मध्यरात्रीत एका झोपेवर जाग आली, नकळत डोळे उघडले...मघाची झाडांमधली चमचम आता आकाशात दिसत होती..निद्रादेवी कोटी कोटी चांदण्यांचं आमच्यावर पांघरूण घालून गेली होती...निसर्गाची ती अद्भुत किमया झोपूनंच न्याहाळण्याचा तो कोण अलौकिक आनंद..!!

पहाटे साडेचारला उठलो..आज खूप मोठा पल्ला होता...सुमारगडावर जाऊन पुढे रसाळगडापर्यंत जायचं होतं..त्यामुळे सकाळी सहाला आवरून निघालो.

गावात पाण्याचं इतकं दुर्भिक्ष होतं की गावातल्या प्रत्येक माणसास सध्या दररोज फक्त दोन हंडे पाणी मिळतंय..इतकं असूनही जाधवमामांच्या घरच्यांनी मागं पुढं पाहिलं नाही आणि आम्हाला पाणी देऊ केलं...आम्ही म्हटलं "पाणी कमी आहे तर तुम्हाला असू द्या.."...त्यावर जाधवमामी म्हणाल्या "आवं, तुमी लई दुरून आल्यात, आमच्याकडं पावनं म्हनून आल्यात..आन् तुमासनी पानी बी न द्यून कसं चालंल? तुमी घ्या पानी...आमी बगून घेऊ.." ही अशी दणकट माणूसकी पाहिली की राकट सह्याद्रीच्या पोटातलं खळाळणारं निर्झर पाणी दिसायला लागतं. आम्हालाच गुन्हेगारासारखं वाटलं आणि कमीत कमी पाणी घेऊन सुमारगडाची वाट धरली.

तासाभरानं अनेक वर्ष ज्याबद्दल कुतुहल मनात होतं त्या राया धनगराच्या झापाशी आलो. इतक्या दूरस्थ आणि अडनिड्या
जागी हा इसम येकटा राहतो. आजूबाजूस जंगल म्हणजे बोलता सोय नाही. काळोखात स्वतःचा हात समोर धरला तरी दिसायचा नाही...अशा जागी एकट्यानं राहाणं हे ऐर्यागैर्याचं काम नव्हे..धन्य तो राया. तीच वाट पकडून झाडोरीतून पुढे सरकत होतो.


या वाटेची रूपं तरी किती सांगावीत? कधी पडवीत खेळणार्या अल्लड मुलीसारखी निरागसपणे धावणारी, तर कधी काट्याकुट्यातून नेऊन अंग ओरबाडणारी...कधी रानवेलींमधून चालताना कधीच सहवास संपू नये असं भासवणार्या प्रेयसीसारखी, तर कधी डोंगराच्या आडदांड सोंडेवर चढताना नाकात दम आणणारी..कधी पैठणीच्या काठासारखी नीटस, तर कधी कशीही बेशिस्तपणे भरकटणारी...कधी ठळक दिसणारी, तर कधी गर्द राईत लपलेली...अशी या वाटेची नाना रूपं अनुभवंत एकदाचे गुर खिंडीत आलो..नाष्टा केला आणि सुमारगडाकडे कूच केलं.

गडावर जाताना वाटेत एक खूप अरुंद वाटेचा ट्रॅव्हर्स लागतो..सुमारगडाच्या पोटातूनंच जातो तो..तिथून पाठपिशव्या घेऊन जाणं धोक्याचं. म्हणून त्या ट्रॅव्हर्सच्या आधीच पाठपिशव्या काढून ठेवल्या आणि पाण्याच्या बाटल्या फक्त पिट्टूत घालून निघालो.


"उगवतीच्या कड्यावरील झाडाच्या खाली आलेल्या मुळीस धरून येंगावं लागतं.." असं दुर्गमहर्षी गो.नि.दांनी केलेलं सुमारगडावरील चढाईचं वर्णन किती यथार्थ आहे. पण आता त्यात मुळीच्या ऐवजी शिडीस धरून येंगावं लागतं, असा बदल झाला आहे. शिडीवरून चढून कड्याच्या बाजूबाजूने चढत जाऊन अखेरीस गडमाथा गाठला.

गडावर मुबलक पाणी, खांबटाकी, वाटेत ४-५ भुयारं, पडके अवशेष. सारा गड फिरलो. बेलदारवाडीतून जो पल्ला चालत आलो, तो निरखला. डोळ्यांवर विश्वास बसेना. केवढालं ते अंतर, केवढालं ते जंगल, किती ते वाटेत डोंगर ज्यांना वळसे घालत घालत आलो. पण सुमारगडानं त्याच्या माथ्यावरून जो नजारा दाखवला त्यांनं सगळे कष्ट कुठल्या कुठे विरून गेले. केवढा तो मुलुख...
महाबळेसरापासून ते मधू-मकरंदगडापर्यंत, खेड पासून ते परबत-चकदेवापर्यंत, आणि वासोट्यापासून ते नागेश्वरापर्यंत सारा पट सह्याद्रीनं मांडून ठेवलेला. तो मनसोक्त निरखला आणि गडावरून उतरणीस लागलो.


पुढील लक्ष रसाळगड...अजून खूप मोठा पल्ला. सकाळच्या कोवळ्या सूर्यकिरणांचं आता चटके देणार्या उन्हात रुपांतर झालेलं..जोडीला भयंकर चिकचिकाट..पण सांगणार कोणाला? रसाळगडाच्या हाकेला "ओ" दिलेली..उन्हाची पर्वा न करता पावलं उचलली...रेटली...आणि गुर खिंडीत आलो..जठराग्नि शांत केला..जरा हायसं वाटलं.

आमच्या वाटदर्शक मामांना विचारलं, "हिकून किती येळ लागंल रसाळगडी जायास?"...मामा म्हणाले "अजून लई लांब हाये त्यो.."

हे मामा म्हणजे शारिरीक काटकतेचा मेरुमणी होते...
नाव सिताराम तुकाराम पवार.
राहणार वाडी बेलदार.
उंची साधारण साडेपाच फूट.
बांधा अतिशय सडपातळ.

मामा खूप वयस्कर दिसत होते. म्हणून सहज त्यांना त्यांचं वय विचारलं...."आसंल आता ऐंशीच्या पुढं..." असं सांगत त्यांनी त्यांच्या पिशवीतून election card काढून माझ्या हातात दिलं आणि म्हणाले, "ह्ये पघा आन् लावा काय त्यो हिसोब.." मी पाहिलं ...त्यात लिहिलेलं "१-१-१९९५ रोजी वय ६४ वर्षे.." म्हणजे आजमितीस त्यांचं वय ८७ वर्षांचं आहे हे उमगल्यावर मला चकवा यायचाच बाकी होता
...८७ वर्षांचा म्हातारा (??), छे छे तरुणंच, आम्हाला बेलदारवाडीपासून ते सुमारगडमार्गे रसाळगडापर्यंत वाट दाखवायला आला होता..पायात फाटकी स्लीपर, डोक्यावर मळकट टोपी, शिवलेली हाफ पँट, अंगात लांब बाहीचा शर्ट, आणि पाठीवर पिशवी आणि आमच्यासाठी वाहिलेलं ५लि. पाणी...खरं सांगतो, हा उलगडा झाल्यावर माझी मला लाज वाटली...काय माणसं आहेत ही...मामांना दंडवत घालून रसाळगडाच्या वाटेस लागलो.


उन्हाचा तडाखा आता फारंच वाढलेला. पण वाट अधूनमधून दाट जंगलातून जात असल्याने पायपीट सहनीय होती. मध्येच इतकी गच्च झुडपं लागत की वाट दिसेनाशीच व्हायची. मग आमचे तरुण मामा दिशेचा अंदाज घेऊन कुठल्यातरी झाडोरीत घुसंत आणि काही वेळानं हाक देत.."या हो.."..की मग आमचा कबिला त्या दिशेला जाई. असं ३-४ वेळा झालं असेल. मागे सुमारगड दिसेनासा झाला, पण अजून रसाळगडाचं काही दर्शन होत नव्हतं. तो अजून बरंच दूर होता असा याचा अर्थ होता. बर्याच वेळानं गचपणातून बाहेर आल्यावर एका टेपाला वळसा घातल्यावर रसाळगडाचं केव्हापासनं हवं असणारं दर्शन झालं. गडावरचं झोलाईदेवीचं मंदीरदेखील लख्ख दिसत होतं. तोच आमचा रात्रीचा मुक्काम असणार होता.

रसाळगड दिसल्यावर झालेल्या

आनंदाबरोबरंच अजून केवढा मोठा पल्ला गाठायचाय याची जाणीवही झाली आणि नकळत पायात बळ येऊन पावलं झपझप पडू लागली. गडाच्या आलिकडील तीन भल्या मोठाल्या दांडांच्या माथ्यावरनं उतरत उतरत रसाळगडाच्या खिंडीजवळ येऊन पोचलो. यापुढील रस्ता ठळक होता. त्यामुळे मामांनी वाट दाखवून दिली आणि म्हणाले, "मी हिथनं परत फिरतो"...मामांना मनोमन धन्यवाद दिले आणि जड मनाने रामराम करून रसाळगडाच्या खिंडीकडे चालते झालो.


अर्ध्या तासातंच खिंडीस बिलगलो. खिंड चढून रसाळगडाच्या उत्तरेस असणार्या पेठवाडीत उतरलो. इथून साधारण २५० पायर्या येंगल्या की थेट गडमाथाच...त्या चढलो..स्वागतालाच गडानं तोफ ठेवलेली...जणु आमचं स्वागत गडानं अदृश्य आणि अश्राव्य अशा तोफधडाक्यानं केलं...गडाच्या दरवाजात डोकं टेकलं आणि झोलाई देवीच्या मंदीरात जाऊन पडलो..

आवारात समोरंच रेखीव दीपमाळ, बाजुला पाण्याचे दोन मोठे तलाव..पूर्वेस पार परबत-चकदेव पर्यंतचा प्रदेश आणि पश्चिमेस मावळतीचं आकाश...मुक्कामास या सुखाव्यतिरिक्त अजून काय आणि कशाला हवं?

रात्री पिठलं भातावर ताव मारला, सवंगड्यांशी गप्पागोष्टी झाल्या...आपल्या अंगाखांद्यावर सुरक्षितपणे बागडू दिल्याबद्दल महिपत-सुमार-रसाळगडांचे आभार मानले, आणि नेहमीच देहभान विसरायला लावणार्या प्रिय सह्याद्रीस पुन्हा मनोमन नमन करून चांदण्यात पहुडलो...या दुर्गत्रयीच्या भ्रमंतीची केव्हापासून मनी बाळगलेली तमन्ना वास्तवात उतरली होती..त्या समाधानात डोळ्याला डोळा कधी लागला ते कळलंच नाही.

No comments:

Post a Comment