Tuesday, March 31, 2020

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव

मुंबई पुणे आगगाडीचा प्रवास - एक सदाबहार अनुभव
-- सौरभ जोशी

लहानपणी आजोळी जाण्याच्या निमित्ताने मुंबई - पुणे हा प्रवास आगगाडीने करण्याची वेळ बर्याचदा येत असे. पुढे आजी-आजोबा जसे ठाण्याला आले, तसं एकूणच पुण्याला जायच्या फेर्या कमी झाल्या आणि आगगाडीने जायचं तर दूरंच राहिलं.

पण आज बर्याच वर्षानी आगगाडीने पुण्याला जायचा योग येतो, नव्हे, तो मी आणतो. अगदी जाणूनबुजून आणतो. लहान मूल पहिल्यांदाच आगगाडीने प्रवास करण्यापूर्वी जसं हौसतं, तसा मी हौसतो. चार -पाच दिवस आधीपासून पुण्याला आगगाडीनं जायचंय असा मी घोषा लावतो. स्वत:च्या कारनं किंवा थेट बोरिवली - स्वारगेट बसनं न जाता मुद्दाम मी दादरहून सकाळच्या डेक्कन एक्सप्रेसने जायचं ठरवतो.

झालं...डेक्कन एक्सप्रेसचं खिडकीच्या सीटचं मी आरक्षण करतो. भल्या पहाटे उठून दादर स्टेशन मी अगदी गाडीच्या नियोजित वेळेच्या अर्धा तास आधीच गाठतो. गाडी कधी एकदा स्टेशनात शिरतेय याची मी अगदी परळच्या दिशेने डोळे लावून अधीरतेने वाट पाहतो. मग दूरवर गाडीचं इंजीन दिसू लागतं आणि मला कोण आनंद होतो...आरक्षित केलेल्या खिडकीच्या सीटवर जाऊन मी बसतो, गाडी सुरू होते....आणि कधी एकदा कल्याण मागे टाकतोय असं होतं...कारण त्यापुढेच खर्या अर्थाने सह्याद्रीच्या संगतीनं आगगाडीचा प्रवास सुरू होतो.

बदलापुर, वांगणी आलं की जुन्या सवंगड्यांच्या भेटीची ओढ लागावी तशी मनाला सह्याद्रीतील दुर्गमित्रांच्या भेटीची ओढ लागते...आणि पहिली दृष्टीभेट होते ती चंदेरीशी...मी मनातूनच साद घालतो आणि खुशाली कळवतो... नेरळ येतं..लगेच दृष्टी पाठीमागच्या पेब किल्ल्याकडे जाते आणि त्याच्या अंगाखांद्यावर बागडून केलेली मनमुराद भटकंती आठवते. त्याच्याच बाजूला उभवलेलं माथेरानचं पठार मनाला भुरळ घालतं. नेरळ मागे लोटताना माथेरानला जाणारी निळ्या रंगाची इटुकली ट्रेन दिसते का याचा नकळत डोळे शोध घेतात.....आणि ती दिसली की लहानपणी जसा आनंद होत असे तसा तो मला आजही होतो.

मग हळूहळू जिभलीला पाणी सुटायला लागतं. कर्जतवरनं जणू हवेबरोबरंच वाहत आलेला बटाटावड्यांचा खमंग वास कर्जतला वडे वाट पाहत आहेत याची ग्वाही देतो..! कर्जत स्टेशनात गाडी थांबते. बटाटेवडे खात खात लक्षं लागतं ते गाडी कधी बरीकशी मागे-पुढे होते याकडे. कारण असतं, गाडीला मागच्या बाजूने अजून एक इंजिन लागण्याचं. ही moment मी आजही अगदी लहान मूल होऊन जगतो.
     
कर्जतहून गाडी सुटते...आणि मग काय पुढे आनंदाचा गाभाच..!! का काय विचारता? अहो, पुढे "कशासाठी पोटासाठी खंडाळ्याच्या घाटासाठी" या ओळी गुणगुणवायला लावण्यासाठी खंडाळा घाट असतो. मग तात्काळ डब्याच्या दाराकडे धाव घ्यायची आणि गार वारा अंगावर घेत सह्याद्रीचा पसारा मनसोक्त न्याहाळायचा.

आता ओढ लागलेली असते ती पहिल्या बोगद्याची. कारण तिथपासून पुढे २६ बोगदे बकायदा मोजायचे असतात. ते कधी कमी भरतात, तर कधी जास्त...पण ते मोजायची हौस मात्र १०० टक्क्यांपेक्षा तसूभरही कमी होत नाही...आणि कधी जर बरोब्बर २६ भरले तर तो आनंद आजही माझ्या गगनात मावत नाही..!! मी आता माझा नसायला सुरुवात झालेली असते.

मी आता दारातून सारखं मागे-पुढे पहायला लागतो. कुतूहल असतं ते, वळणावरनं गाडी जाताना पुढचं आणि मागचं इंजिन दिसतं का ते पहायचं..! बाकदार अळीसारखी ती गाडी आणि तिची ती पुढे-मागे अशी २ इंजिनं दिसली की अहाहा...काय ती मौज...त्यातून अगदी बाकदार वळणावर छोटा बोगदा आला की, बोगद्यातून पलीकडे पुढे गेलेले डबे, मग बोगद्यात गायब झालेली गाडी, अलीकडे गाडीचे बोगद्यात न गेलेले डबे, आणि सर्वात पुढे आणि मागे एक-एक इंजिन, असं मोठं गमतीदार दृश्य दिसतं...आणि मी खुळा होतो.

मग अनेक बोगद्यांतून बाहेर आल्यावर आपण केवढे उंच आलो आहोत याचा अचानक साक्षात्कार होतो ते बाजूस दिसणार्या  उल्हास दरीकडे पाहून..!! मध्येच दरीवर बांधलेले पूल, एकापाठोपाठ एक बोगदे, बोगद्यांमधील काळा कुट्ट काळोख, आत असलेले पिवळ्या रंगाचे दिवे, घाटातल्या चेक पोस्टवर लाल-हिरवा बावटा घेऊन उभा असणारा लाइनमन, मधुनंच एखादं लोणावळ्याला गाडीला सोडून परत कर्जतकडे मोठ्ठा भोंगा मारत आणि खणखणाट करत उतरणारं एकटंच इंजिन...हे सारं काही मला आजही मोहिनी घालतं..!

घाटातनं जाताना दरीच्या पलीकडे दिसणारे श्रीवर्धन आणि मनरंजन हे राजमाचीचे दोन बालेकिल्ले, पलीकडे कुसुरचं पठार, ढाक-बहिरीचा डोंगर, त्याला बिलगलेला कळकरायचा सुळका, मांजर दबा धरून बसलंय असा भास देणारा मांजरसुंभाचा डोंगर असा सगळा सह्याद्रीनं मांडलेला पट डब्याच्या दारातूनच निरखणं म्हणजे क्या बात है...!! सगळच खुळावणारं...संमोहनात टाकणारं...हृदयाला भिडणारं आणि जिव्हाळ्याचं...या सगळ्यांना मी मनातूनच नकळत मुजरा घालतो......पु.लं. च्या भाषेत सांगायचं तर या सार्या  मंडळींकडे पाहताना वाटतं की, खरंच आपले मावळे यातनं चढता-उतरताना दिसले तर काय बहार येईल...या विचारांत माझी समाधी कधी लागते ते माझं मलाच कळत नाही...कारण आता मी अजिबात माझा राहिलेला नसतो.

बघता बघता खंडाळा येतं. खंडाळा स्टेशनचं तिकिटघर तिथं उल्हास व्हॅली आणि इतर अनेक ट्रेक्सच्या निमित्ताने काढलेल्या रात्रींची आठवण करून देतं. तिथं रात्री म्हटलेली धम्माल गाणी, टाकलेले पत्त्यांचे डाव, बाहेर धुवाधार पाऊस चालू असताना स्लीपिंग बॅगमध्ये गुरगुटून काढलेल्या रात्री, स्टेशनजवळ असलेल्या प्रथमोपचार केंद्राच्या पडवीत रात्री झोपलो असताना तिथे एका बाळाच्या जन्माच्या रडण्याने खसकन आलेली जाग आणि त्याच्या बापानं आम्हाला वाटलेले पेढे...सारं सारं मन:पटलावरून सरकायला लागतं आणि हसू येतं....मी त्या nostalgic ट्रान्समधून गचकन बाहेर येतो, तो चिक्कीच्या वासानं..!!...आणि मला कळतं, अरेच्चा!! लोणावळा आलं पण..!!
कर्जतचा बटाटावडा ते लोणावळ्याची चिक्की या २ बिंदूंत निसर्गानं आणि आठवणींनी माझ्यावर अलौकिक आनंदाची पखरण केलेली असते. त्यातून बाहेर यावसंच वाटत नाही.

गाडी लोणावळ्यातनं बाहेर पडली की मग मुंबई - पुणे रस्ता दिसायला लागतो. त्यावरची धावणारी वाहनं पाहून "ए, आपली झुकझुकगाडी बघ किती फास्ट जातेय" असं मी माझं मलाच सांगतो..!! या आनंदात लोहगड-विसापूरची जोडगोळी कधी दिसायला लागते ते कळंतंच नाही. मग हळुहळु "ते शहर पुणे, तेथे काय उणे" याची चाहूल लागायला लागते.

अशा या सार्या अवीट प्रवासाच्या आठवणी मी मनाच्या पेटीत बंद करीतंच पुणे स्टेशनवर उतरतो. मी पक्कं ठरवतो की, परत मुंबई - पुणे आगगाडीनं नक्की यायचं....मन विचारतं "कशाला?"...मी मनाला म्हणतो, "अरे वेड्या मना, खुळं होण्यासाठी रे..लहान मूल होऊन झिंगण्यासाठी रे...वय विसरण्यासाठी रे..!"

No comments:

Post a Comment